वात आणि कफ (article in महाराष्ट्र टाइम्स 5 Nov 2011)
हिवाळ्यापूर्वीचा शरद ऋतू हा डॉक्टरांच्या व्यस्त असण्याचा काळ. कारण साथीचे आजार, उष्णतेचे विकार या काळात अधिक प्रमाणात फैलावतात. पण लगोलग येणारा हिवाळा अन त्यातील पहिला ऋतू हेमंत हा अतिशय आरोग्यदायी आणि उत्साही, त्यामुळे बहुतांश लोकांना मानवणाराच ठरतो. मात्र या काळात कफ तसेच वात वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
…………
>> हिवाळ्याचे फायदे
शरीरातील उष्णतेचे विकार, वाढलेले पित्त कमी होते.
नैसर्गिकरित्या शरीराला सर्वाधिक बळ मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते.
पचायला जड असणारे पदार्थही सहज पचतात कारण इतर ऋतूंच्या तुलनेत अग्नि प्रखर होऊन भूक वाढलेली असते.
मात्र पचायला जड असणारे स्निग्ध आणि शरीराच्या पोषणासाठी अयोग्य असे पदार्थ खाल्ले तर शरीरात वातदोष वाढू शकतो. वात, पित्त, कफ हे शब्द नेहमी नकारात्मक भावनेने ऐकायला मिळतात, मात्र शरीरातील सर्व गती (हृदय, फुप्फुस, अन्नसेवन, पचन, मलविसर्जन, रसरक्ताभिसरण स्नायुंची कामे) या वातदोषाने संतुलित राखल्या जातात.
तसेच शुद्ध स्वरुपातील कफदोष शरीराचे पोषण करणे, शरीराचे बळ, स्थिरता, सांध्यातील स्निग्धता टिकवणे यासारखी अनेक महत्त्वाची कामे करतो.
या ऋतूत होणारे आजार
>> थंडीमुळे, ऋतू बदलाने- सर्दी, खोकला, सांधे दुखणे, जखडणे इत्यादी.
>> आधीपासून असलेला दमा, संधीवात, जुनी सर्दी, आमवात, न्युमोनिया इत्यादी आजारांचे वेग व लक्षणांची तीव्रता कफवाताने वाढते.
>> योग्य आहार, विहार, व्यायाम न केल्याने, स्निग्धता कमी होऊन वातदोष वाढून मलबद्धता, पायांना भेगा पडणे, त्वचा, केस कोरडे होणे, कोंडा, केस दुभंगणे, तुटणे, गळणे, सांधे कुरकुरणे…
योग्य आहार, व्यायाम कुठला?
काय खाऊ नये
>> कोरडे पदार्थ, तुरट-तिखट, कडू पदार्थ (वातासाठी अयोग्य) शीतपेय, सरबत इ. (कफ-वात होतो)
>> डबाबंद फळे (कफाचा त्रास)
>> मोड आलेली कडधान्ये जास्त खाऊ नयेत. वात वाढतो.
काय खावे?
>> तांदूळ, गहू (दोन्ही नवीन- नवीन धान्य जड असले तरी ते या ऋतूत पचले जाते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.), कुळीथ, उडीद, तूर, तीळ, अळीव, शेंगदाणे
>> कडधान्य, लसूण वा गूळ घालून केलेल्या उसळी (प्रमाणात),
>> मूग, मटकी, उडीद यांचे घावन, डोसे, सुंठ, जिरे, हिंग, हळद इ. घालून शिजवून केलेले वरण
>> ऋतुनुसार मिळणारी व मानवणारी सर्व ताजी फळे
>> फळभाज्या जास्त प्रमाणात व नियमित खाव्यात
>> गरम पाणी, दूध (हळद घालून), ताक, तूप, मध (गरम पाण्यासोबत किंवा गरम करून घेऊ नये), उसाचा रस, तेल इत्यादी
>> सुका मेवा- अंजीर, काळ्या मनुका, बदाम, खजूर, काजू, पिस्ते, अक्रोड, चारोळ्या, जर्दाळू, खारिक यापैकी दोन तीन पदार्थ कमी प्रमाणात
>> तिळापासून बनवलेले गोड पदार्थ, ओले खोबरे. यामुळे त्वचा व केसांचा कोरडेपणा कमी होतो.
” स्निग्ध पदार्थांविषयी (तेल, तूप इ.) हल्ली लोकांमध्ये भीती पसरवली जाते की या पदार्थांनी कोलेस्टेरॉल, फॅट्स (चरबी) वाढते. पण हा गैरसमज आहे. तेलात किंवा तूपात तळलेल्या पदार्थांनी चरबी वाढते. पण जेवताना भातात घातलेले चमचाभर तूप, पोळीला लावलेले तेल सांध्यांच्या, हाडांच्या बळकटीसाठी, आतड्यातील कोरडेपणा कमी करून मलबद्धता नष्ट करायला आवश्यकच असते. “
………
काय करावे
>> तीळ तेलाने पूर्ण अंगाला मालिश करून गरम पाण्याने आंघोळ.
>> कफ झाल्याने चरबी वाढू शकते. ते टाळण्यासाठी स्थूल व्यक्तींनी उटणे लावून शेक घेणे.
>> तुळशीच्या पानांचा रस किंवा आल्याचा रस हे कफासाठी चांगले. मात्र ते सर्वांसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे ते घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
>> केसांना, पायांना तेल तसेच चेहऱ्याला, ओठांना लोणी किंवा तूप लावणे
>> घरात अगरू, राळ, गुग्गुळ, कडुलिंबाची सुकी पाने, ओवा, बाळंतशोपा यांचा धूप जाळणे. घरातील वातावरण उबदार होते तसेच जंतूंचा नाश होतो.
>> चालणे, धावणे, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, दोरीच्या उड्या यापैकी वयानुसार योग्य तो व्यायाम करणे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10614549.cms
