एका लहान मुलीच्या आत्मचरित्रातील काही प्रसंग…

martha 

“Ma, He Sold Me For a Few Cigarettes”
By Martha Long
 
अंगावर काटा आणणारे एकापेक्षा एक भयंकर प्रसंग, जे वाचत असतानाही डोळ्यातले पाणी कधी पापण्यांची मर्यादा सोडून बाहेर वाहू लागते हेही कळत नाही, त्याला जी मुलगी प्रत्यक्ष सामोरी गेली आहे, तीही वयाच्या ६व्या ७ व्या वर्षी, तिने एवढे तटस्थपणे लिहावे !! कुठली ताकद असेल ही, कुठून येते हे बळ, सारे सोसूनही कुणालाच दोष नाही, दैवाचा उद्धार नाही, तर स्वतःवरच्या क्षमतेवरील विश्वासाचे नेहमी असलेले भान हेच प्रत्येक प्रसंगात गवसत जाते, प्रेरणा देत जाते.

आयुष्यात न मिळालेल्या कितीतरी गोष्टींचा हिशोब मांडण्यातच आपले अर्धेअधिक जगणे खर्ची पडत असते. कधीतरी आपले जेवण ३-४ तास उशीरा झाले असेल किंवा काही कामामुळे उपास घडला असेल असा दिवस आठवून बघावा, पोटात भूकेचा डोंब उसळलेला असतो, अन पावले स्वयंपाकघराची (घराबाहेर असतो तेव्हा हॉटेलकडे) वळतात.

अशावेळी ३ दिवस उपास घडलेली लहान मुलगी हातात मिळालेली कष्टाची कमाई स्वतःच्या आईला नेऊन देते. त्याच आईला जिने स्वतःला आधार मिळावा, वेळप्रसंगी शारीरिक भूक भागवी ह्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या पुरुषांची सोबत स्वीकारलेली असते; त्या पुरुषांच्या भावना जपताना, त्यांच्याकडून मिळणारा मार चुकवण्यासाठी कितीतरी वेळा ह्या पोटच्या लेकीची प्रसंगी उपासमारही केलेली असते. अशा आईबद्दलही कुठलाच राग, कसलाच दुराग्रह मनात न ठेवता हातत आलेली कमाई केवळ तिच्या चेह-यावर फुलणारे हसु पाहण्यासाठी ही लहानगी आईच्या स्वाधीन करते. कुठून येतो हा एवढा समजूतदारपणा, केवळ परिस्थितीने आलेलं शहाणपण की अंगात उपजत असलेली परिपक्वता.

असाच एक काळजाला भोके पाडणारा प्रसंग, (आणि त्या प्रसंगात त्या मुलीच्या मनात आलेले विचार)ह्यानंतर त्याच दिवशी ती शिक्षिका सगळ्या विद्यार्थ्यांना दुस-या दिवशी शाळेत येताना विणकामासाठी सहा पेनीज आणायला सांगते. ह्याच दिवशी मार्थाच्या घरातील कोळसा, दूध, ब्रेड सारे काही संपलेलं असते. आणि बाप सिगारेटसाठी कासावीस झालेला असतो. तो मार्थाला व तिच्या चवथ्यांदा गरोदर राहिलेल्या आईला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवतो. प्रीस्टकडून पैसे मागून आणायचे अन त्या पैशात हे सगळे सामान घेऊन जायचे असे ठरते.

पहिला प्रीस्ट जेवढे पैसे देतो त्यातून दूध, ब्रेड, कोळसा एवढे सामान खरेदी होते. पण घरी सिगारेटशिवाय गेलो तर बाप जीवही घेईल ह्या भितीने मार्था अजून एका प्रीस्टकडे जाऊन थोडे पैसे घेते. सिगारेट्ससाठी पुरेसे असतात तेवढे पैसे. पण तिच्याजवळ शाळेत नेण्यासाठी काहीच शिल्लक रहात नाहीत.

 दुस-या दिवशी शाळेत गेल्यावर ती शिक्षिका विचारते कुणी कुणी पैसे आणले नाहीत ते. मार्थाजवळ अर्थातच पैसे नसतात. शिक्षिका तिला त्याचे कारण विचारते, तर “आईने पैसे दिले नाहीत” हेच खरे असलेले कारण मार्था आधी सांगते. पण आईजवळ पैसे का नव्हते किंवा तिने का दिले नाहीत हे मात्र सांगत नाही. मात्र शिक्षिकेला हे कारण खोटे वाटते, ती मार्थाला दरडावून विचारते, सगळ्या वर्गासमोर पुन्हा पुन्हा खरे कारण काय आहे असे विचारत रहाते. तिच्या मानेला धरुन गोल गोल फिरवून रागने तिला धमकावत रहाते.

शेवटी आदल्या दिवशी मिळालेल्या माराची आठवण होऊन मार्था भितीने तिला सांगते की, “मीच आईला विचारले नाही, मी विसरले.” मग पुन्हा, “तू माझ्याशी आधी खोटे बोललीस” असे म्हणत ती शिक्षिका पुन्हा मार्थाला त्या वेताच्या छडीने सपासप मारायला सुरुवात करते. तिच्या दोन्ही हातांवर छडीचे वळ उठतात. पण शिक्षिकेने सांगितलेलं असते की, “हात मागे केलास तर प्रत्येकवेळी ६ फटके वाढत जातील.” त्यामुळे ती सारे सहन करत रहाते.

पण त्याच वेळी तिच्या मनात मात्र असे विचार चालु असतात,

पुढचा संपूर्ण आठवडा ही लहानगी मार्था शाळेत न जाता लोकांना सामान आणून देऊन, त्यांची इतर कामे करुन सहा पेनीज जमवते अन दुस-या दिवशी शिक्षिकेला नेऊन देते व आईने दिले असे सांगते [मार्थाच्या मनात असा विचार येतो की, if I told her tha (that), I would be ashamed of meself (myself), cos then they would all know their mammies are better than my mammy. Cos all the mammies are poor, but still manage to give their children (children) the sixpence, an (and) mine can’t.].

  तेव्हा हे पैसे तिला तिच्या आईने देणे शक्यच नाही, कारण जर ते द्यायचेच असते तर ह्यपूर्वीच दिले असते, असे म्हणून ती शिक्षिका मार्थावर चोरी केल्याचा आरोप करते. त्या चिमुरडीच्या दोन्ही हातांवर वेताच्या छडीचे सपासप मारलेले फटके हीच तिच्यासाठी योग्य शिक्षा आहे असेच त्या निर्दयी शिक्षिकेला वाटते.

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना पण त्या छोटीच्या मनात मात्र

ह्या प्रसंगानंतर एक वेगळेच प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभे राहते. आता जॅक्सर काय म्हणेल? कारण आपल्याजवळ एवढे पैसे होते आणि तरीही त्याला काहीही न पत्ता लागु न देता शाळेत शिक्षिकेला आणून दिले हे जर त्याला कळले तर तो आपल्याला मारुन टाकायलाही कमी करणार नाही ही भिती. सिगारेटसाठी त्याचे वेडं असणे तिला पुरते माहित होते. कुठल्या परिस्थितीतून गेली असेल ही चिमुरडी. नुसते वाचताना अंगावर काटा येतो, मग हे सारे त्या कोवळ्या वयात भोगताना तिचे काय झाले असेल….

 हातावर वेताची छडी ओढली जात असतानाही हात अजिबात मागे न घेता सारे सहन करणं, बापाची भिती सतत असतानाही मनात अतिशय संयत विचार असणं, हे सारेच विलक्षण. मनोधैर्य याहून काही वेगळं नसावे. वयाच्या ६-७ व्या वर्षी कुठून येते हे बळ? ही सोसण्याची जिद्द? हे अचाट मनोधैर्य? ही निव्वळ परिस्थितीने आलेली समज तर नक्कीच नाही. हे मनोधैर्य अंगभूत असतेच, पण परिस्थितीला शरण न जाता ते सिद्ध करायची वेळ असते तेव्हाच माघार न घेता ठाम उभे राहणे ज्यांना जमते तेच भविष्यात काहीतरी करुन दाखवतात, मोठ्या पदाला पोचतात.

तिचे सावत्र वडील जॅक्सर, ज्यांना सिगारेट्सचे अतोनात व्यसन. त्यासाठी ते मार्थाला वा तिच्या लहान भावाला मारायलाही कमी करत नाहीत. ते तिला एका शाळेत घालतात जिथे ते पूर्वी स्वतः शिकलेले असतात. त्या शाळेतला मार्थाच्या आयुष्यातला हा प्रसंग,

पहिल्याच दिवशी तिथली एक शिक्षिका विद्यर्थ्यांना काही वाक्य लिहायला सांगते. मार्थाचे आधीचे शिक्षण सलग व पुरेसे झालेले नसल्याने तिला ती वाक्य नाही लिहिता येत. ह्यासाठी ती शिक्षिका तिचा भर वर्गात सगळ्यांच्या समोर अपमान करते, तिला छडीने मारते. पण हा अपमान त्या मार्थाच्या मनात कुठेच रागचे रुप धारण करत नाही. ती हा अपमानही सहन करते. जे काही घडलेय त्यात वेगळं काहीच घडले नाहीये असे वाटून सगळ निमूटपणे केलेला स्वीकार जास्त जाणवतो इथे.

एका लहान मुलीचे आत्मकथन अशा स्वरुपात हे पुस्तक आहे. अतिशय सहज सोप्पी भाषाशैली पण थेट काळजाला हात घालणारे अगणित प्रसंग. म्हणजे सहज, साधे, अगदी नेहमीच्या बोलण्यातले शब्दही कसे जिवंत होतात, त्यातल्या भावना कशा बोलक्या होऊ लागतात हे अनुभवायचे असेल तर हे पुस्तक प्रत्येकानेच वाचावे. स्वतःबद्दल लिहिताना कुठेही अवास्तव कारुण्य नाही, सहानुभूती मिळावी ही अपेक्षा नाही, अजिबात आक्रस्ताळेपणा नाही, स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतेय असा कुठलाही अनाठायी आव नाही. जे जसे झालेय ते तसेच मांडण्याचा निव्वळ प्रामाणिक प्रयत्न. आणि म्हणूनच त्या सांगण्यातली हीच निरागसता अधिक भावते.

कर्ण खरा कोण होता??

दाजी पणशीकर ह्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक. काही कादंब‍र्‍या, ऐतिहासिक पुस्तके ह्यामधे महाभारतात वर्णित कर्णापेक्षा एक वेगळाच कर्ण समोर आणला जातो.. एक अनावश्यक उदात्तीकरण अन सहानुभूती ह्यामुळे कर्णाचे खरे स्वरुप कुठेतरी मागे पडले.. अन फक्त कुंतीच्या एक निर्णयामुळे सूतपुत्र म्हणून ओळखल्या जाणा‌‌‍र्‍या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्यानंतर अंगावरील कवचकुंडल उदारपणे देणारा कर्ण समोर आणला जातो, मग मित्रत्वाच्या अन उपकाराच्या ओझ्याने दबलेला अन म्हणून दुष्टकर्मात सहभागी झालेला कर्ण अशा पुस्तकातून समोर येतो.. द्रौपदीच्या उपहासात्मक हसण्याने अपमानित झालेला कर्णही आपल्याला दिसतो, अर्जुनाएवढाच कर्णही पराक्रमी होता असेही सांगितले जाते.. पण मग प्रश्न येतो की हे एवढेच त्याचे खरे स्वरुप आहे?? कर्णाचे हे रुप खरे की महाभारतात व्यासांनी वर्णन केलेलं रुप खरे?? ह्या प्रश्नाचे उत्तर ’कर्ण खरा कोण होता’ ह्या पुस्तकात ब-याच अंशी सापडते..

कर्ण सूतपुत्र म्हणून प्रथम जगासमोर आला असला तरी तो अनाथ म्हणून नक्कीच मोठा झाला नव्हता.. एका चांगल्या घरात, सुसंस्कारित मात्यापित्यांचे निरतिशय प्रेम मिळुनच त्याचे संगोपन झाले. कर्ण जर उदार होता तर मग कवचकुंडल दान म्हणून देताना बदल्यात इंद्राकडून प्रभावी अस्त्र का मागून घेतले? दान हे निरिच्छ भावनेने केले जाते.. इथे आपल्याला असे वाचायला मिळते की इंद्राने प्रसन्न होऊन वर दिला.. पण खरेच हे असेच झाले का? की मूळ इतिहास काही वेगळा आहे?

कर्ण खरेच अर्जुनाहून पराक्रमी होता का? मग एकदाही त्याने अर्जुनाचा पराभव कसा केला नाही? प्रत्येक युद्धात अर्जुनाकडून त्याचा पराभवच झाला आहे.. एका प्रसंगात तर अनेक फुशारक्या मारुन पराभावाने लज्जीत होऊन रणांगणातून पसार व्हावं लागले..

कर्ण खरेच जर सद्गुणांचा पुतळा होता तर स्वतः भगवान कृष्णांनी अर्जुनाचा पक्ष का घेतला? कृष्णाने गीतेतही हे स्पष्ट केलेय की धर्माच्या रक्षणासाठी अन साधूंच्या परित्राणासाठी मी अवतार घेतो. मग असे असताना कर्णाचा पक्ष का नाकारला.. इथेच स्पष्ट होते की कर्णाचे जे रुप समोर आणले जातेय ते अनावश्यक उदात्तीकरण आहे.. खरा इतिहास खुप वेगळा आहे..

खरेतर प्रत्येकाने आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे.. ह्या पुस्तकातील सगळे भाग इथे देणं शक्य नाही.. पण काही भाग जमेल तसे इथे देत जाईन.. इतिहासाचा माग घेण्यात मोलाची मदत होते ह्या पुस्तकाने..

पुस्तकातील काही भाग -

१) महर्षी व्यासांनी महाभारतात कोणत्याही व्यक्तिरेखेचे वर्णन करताना कोणत्याही स्त्री-पुरुषाचे गुणदोष लपविलेले नाहीत. कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कोणाचा अधिक्षेपही केलेला नाही. धर्मज्ञ धर्मराजाचे चित्र रंगवताना व्यासांची प्रतिमा धर्मराजाचे द्यूताचे व्यसन किती विलक्षण आहे हेही निर्विकारपणे दाखविते आणि धर्मपरायण असलेला भीम दुःशासन मेल्यावरही त्याचं रक्त किती आसुरी आनंदानं प्राशन करतो हेही अलिप्तपणे दर्शवते. म्हणजेच व्यास चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतात. परंतु वाईटाला मात्र ते ’चांगलं’ म्हणत नाहीत.

………………………………

त्याचा(कर्णाचा) थोरपणा अव्यक्तच का राहिला? कालिदास, भारवी, माघ, हर्ष, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि अगदी अलिकडचे महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक, न्या. रानडे, भांडारकर इत्यादींपैकी एकाही प्रज्ञावंताला हा आधुनिकांचा कर्ण का आकृष्ट करु शकला नाही? कर्णाचा पक्ष घ्यावा असं यापैकी एकाही पुरुषोत्तमाला का वाटलं नाही.. यापैकी एकही महात्मा कर्णप्रेमाने हर्षविव्हल का होऊ शकला नाही?

२) कौरव पांडवांबरोबर वृष्णि व अंधक कुळातील युवक, अनेक देशांचे राजकुमार व अधिरथ सूताचा मुलगा कर्ण हे द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आलेले आहेत(आदिपर्व अ.१३२).

पांडवांविषयी दुर्योधनाला द्वेष वाटणे रक्तदोषामुळे स्वाभाविक आहे हे आपण समजू शकतो; परंतु कर्णाला विद्यार्थीदशेत आपलेच सहकारी असलेले पांडव, विषेशतः अर्जुन, यांचा मत्सर करण्याचे काहीच कारण संभवत नाही. परंतु कर्णाच्या जन्मगत मत्सरी वृत्तीला दुर्योधनाच्या दुष्टवृत्तीचे खतपाणी मिळताच कर्णही सर्वच पांडवांचा आत्यंतिक मत्सर करु लागला आहे.

दुर्योधनं समाश्रित्य सोSवमन्यत पांडवान् || ” (आदिपर्व अ. १३२)

वास्तविक विद्यार्थीदशेत अर्जुनाचा व पांडवांचा कर्णाने द्वेष करावा असा कोणताही कटू प्रसंग या शैक्षणिक काळात या विद्यार्थ्यांत निर्माण झालेला नाही. इतर विद्यार्थ्यांना या द्रोणाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला तसाच तो कर्णालाही मिळालेला आहे.(आदिपर्व अ. १३२ श्लोक ११) कर्णाला केवळ प्रवेशच मिळाला पण द्रोणांनी त्याला धनुर्विद्या दिलीच नाही असाही पुरावा नाही. परंतु विद्याग्रहणाच्या बाबतीत व विद्यादात्या सद्गुरुंविषयी जेवढी आस्था आणि निष्ठा अर्जुनाने वेळोवेळी संपादन केली होती तेवढी आस्था व निष्ठा कर्णाने या काळात कधीच दाखवलेली नाही.

३) धनुर्वेदाच्या पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांना असे विचारले की ’मुलांनो माझ्याजवळून शस्त्र व अस्त्र विद्यांचे शिक्षण घेतल्यानंतर, माझ्या अंतःकरणातील एक इच्छा पूर्ण कराल ना?’ या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सर्व उपस्थित विद्यार्थी चूप बसून राहिले. त्या विद्यार्थीवर्गात असलेल्या अर्जुनानेच फक्त आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक आश्वासन दिले.(आदि.१३२)

….. त्याचा अनुल्लेख करावा इतका तो यःकश्चित वा सामान्य धनुर्धर नव्हता. अकारण तो अर्जुनाशी स्पर्धा करत असल्यामुळे त्यानेही धनुर्विद्येत लक्ष केंद्रित केले असणारच. धनुर्विद्येत अशाधारण नैपुण्य मिळावे या शुद्ध व सात्विक भूमिकेतून दिवसा व रात्रीच्या अंधारातही निष्ठेने व सातत्याने अभ्यास करणारा अर्जुन व मत्सरग्रस्त भूमिकेतून अर्जुनापेक्षा य विद्येत श्रेष्ठ ठरावे म्हणून जळफळून धनुर्विद्येचा अभ्यास करणारा कर्ण या दोन परस्परांविरुद्ध अशा वेगळ्या भूमिका आहेत. एकाचे अधिष्ठान आहे निष्ठा व नम्रता, तर दुस-याचे अधिष्ठान आहे द्वेष, असूया, स्पर्धा! 

४) दुष्कृत्यात भागिदारी -

कौरव-पांडवांमध्ये भीम हा अत्यंत बलशाली म्हणून प्रसिद्ध होता. सहाजिकच दुर्योधन भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे त्याचा मनोमन द्वेष करु लागला. सरळ सामना करुन भीमाचा काटा काढण्याचे सामर्थ्य एकट्या दुर्योधनातच काय पण शंभर कौरवातही नव्हते. त्यामुळे कोणत्याही वाममार्गाने, क्रूरकर्म करुन भीमाला ठार मारण्याचे मनसुबे दुर्योधन रचु लागला. त्यातून भीमाला जहरी सापांचा दंश करणे, तो बेशुद्ध असताना त्याचे हातपाय बांधून त्याला डोहात बुडविणे, त्याला अन्नातून कालकूटासारखे प्राणघातक विष खायला घालणे असले दुष्ट हिंसाचार भीमाचा प्राण घेण्यासाठी दुर्योधनाने भीमावर केलेले आहेत. आणि त्या दुष्कृत्यात दुर्योधनाला दुःशासन, शकुनी यांच्यासह कर्णानेही साहाय्य केल्याचा महाभारताने पुरावा दिला आहे.

 

एवं दुर्योधनः कर्णः शकुनिश्चापि सौबलः।

अनेकैरभ्युपायेस्तां जिघांसन्ति स्म पांडवान्॥ (आदि. अ. १२९)

मोह, ऐश्वर्य आणि लोभबुद्धी यामुळे दुर्योधनाची बुद्धी विकृत झाली व तो पांडवांना पाण्यात पाहू लागला. दुर्योधनाच्या या विकृतीमागे दुष्ट धृतराष्ट्राची अंतःप्रेरणा जशी होती, तशी राज्यलोभाची दूरदृष्टीही होती. त्यामुळे पांडवांविषयीच्या दुर्योधनाच्या द्वेषबुद्धीला काही कारण तरी संभवते परंतु कर्णाच्या पांडवद्वेषाला तसे कोणतेच सबळ कारण महाभारतात सापडत नाही. निदान शस्त्रास्त्रकौशल्य प्रदर्शनात कर्णाने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देईपर्यंत तरी, पांडवांचे व कर्णाचे भांडण वा कलह झाल्याची नोंद महाभारतात नाही किंवा पांडवांचा कर्णाने मनापासून विद्वेष करावा असा कोणताही अपराध पांडवांनी केलेला नाही.तरीही अकारण द्वेष करणारा कर्ण विद्यार्थीदशेपासूनच, दुर्योधनाच्या नादी लागून, पांडवांचाही शत्रू म्हणून विख्यात झाला आहे.